The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Home » » आलं उधाण दर्याला.

आलं उधाण दर्याला.

Written By Nikhil Salaskar on Wednesday, 27 March 2013 | 04:14


मोगली ठाण्यांवर शिवाजीराजांनी अचानक हल्ले केल्यामुळे औरंगजेब संतापलेलाच होता। पण आत्ता यावेळी काहीच करता येत नाही. हे लक्षात घेऊन तो दिल्लीला गेला. पण त्याच्या मनात शिवाजीराजांचा पुरेपूर काटा काढायचा हे नक्कीच झालं. विस्मय वाटतो , तो राजांच्या कमालीच्या धाडसाचा. एका कर्दनकाळ सत्तेच्या विरुद्ध आपणहून बेमुर्वत हे असलं लष्करी राजकारण करायचं राजांनी साहस केलं ही अत्यंत मोठी झेप होती. पण ती अतिशय विचारपूर्वक म्हणजेच अभ्यासपूर्वक होती. तो वेडेपणा नव्हता. तो मिळत असलेल्या संधीचा अचूक अन् हमखास फायदा घेणं होतं. तो फायदा राजांना झालाच.
अशा अनेक संधी पुढच्या इतिहासात पेशव्यांना लाभल्या। पण त्याचा फायदा क्वचितच एखाद्या प्रसंगी घेतला गेला. तसा प्रत्येक संधीचा फायदा इंग्रजांनी आमच्याविरुद्ध अचूक टिपला. लहान वयात आणि आपल्या लहानशा सैन्यानिशी राजांनी अनेकदा अवघड डाव धाडसानं जिंकले. ज्याला नेतृत्त्व करायचं आहे , त्याने शिवचरित्राचा बारकाईने अभ्यास करावा. काळजांत अचूक कल्पनेची कळ येईल. बुद्धीत बळ येईल अन् पदरात फळ पडेल. आता आपण शिवाजीराजांचा नुसताच जयजयकार जरा कमीच करावा!
दि. २४ ऑक्टोबर १६५७ या दिवशी शिवाजीराजांनी कल्याणपासून दक्षिण कोकणात सावंतवाडीपर्यंत वादळी स्वारी मांडली। महिनोन्महिने राजा स्वारीवर आहे , त्याला विश्रांती सोसतच नाही. या कोकण मोहिमेत संपूर्ण कोकण महाराजांच्या कब्जात आलं असं नाही. पण किनाऱ्यावरचे अनेक किल्ले आणि काही जलदुर्ग महाराजांनी सुसरीनं शेपटाचा फटकारा मारून एकेक भलामोठा मासा मारावा , तसा एकेक जलदुर्ग राजांनी मटकावला. हरणेचा किल्ला , जयगड , घेरिया , देवगड , रेडी अन् थेट तेरेखोल शिवाय सह्यादीच्या अंगाखांद्यावरती असलेले अनेक गिरीदुर्ग महाराजांनी काबीज केले. केवढं प्रचंड वादळ आहे हे! आमच्या तरुण मनात असंच काही अचाट कर्तृत्त्व , आजच्या हिंदवी स्वराज्यात आपणही गाजवावं असं येतंच नाही का ? का येत नाही ? आळस ? अज्ञान ? बेशिस्त ? अभिमानशून्यता ? आत्मविश्वासाचा अभाव ? अल्पसंतुष्टता ? सगळंच काही!
याच काळात इंग्लिश टोपीवाले व्यापारी , बंदुकवाले लष्करी पोर्तुगीज अन् सारेच अठरा टोपीकर फिरंगी हजारो मैलांवरून सागरी मार्गाने भारतात येत होते। उंदराच्या कानाएवढे आणि विड्याच्या पानाएवढे यांचे देश. नकाशावर लौकर सापडतही नाहीत. पण त्यांची महत्त्वाकांक्षा लाटेवर स्वार होऊन आम्हाला लुटायला आणि कुटायला येत होती.
कोकणातील या स्वारीत ( इ। स. १६५७ ते ५८ ) शिवाजीराजांच्या नजरेस अनेक गोष्टी आल्या. काही सुखावणाऱ्या तर काही मिरचीसारख्या झोंबणाऱ्या त्यात राजांना जी कोकणी मनं आणि मनगटं गवसली , ती फारच मोलाची होती. मायनाक भंडारी , बेंटाजी भाटकर , दौलतखान , सिदी मिस्त्री , इब्राहिमखान , तुकोजी आंग्रे , लायजी कोळी सरपाटील आणि असे अनेक. आगरी भंडारी , कोळी , कुणबी , प्रभू , सारस्वत मंडळी महाराजांच्या या जागर- गोंधळात कर्तृत्त्वाचे पोत पेटवून राजांच्या भोवती हुकूम झेलायला अधीरतेन गोळा होऊ लागली. हे सारेच समाजगट खरोखर गुणी होते. शौर्य , धाडस , कल्पकता , निष्ठा पराक्रमाची हौस आणि उत्तुंग महत्त्वाकांक्षा या तरुणांच्या रोमरोमात उसळत होती. राजांनी या कोकणी चतुर काळसुंद्यांचा अचूक उपयोग करायच्या योजना आखल्या. कृतीतही आणल्या.
या आगरी , कोळी , भंडारी पोरांचं काय सागरी अप्रूप सांगावं ? जन्मल्यावर यांना आधी समुदात पोहता येत होतं. अन् मग जमिनीवर रांगता येत होतं.
एकच पुढच्या काळातील इतिहासातील साक्ष सांगू का ? शिवाजीराजांच्या मृत्युनंतर औरंगजेबानं मराठी राज्य गिळून टाकण्याकरता अमाप दळवादळ घेऊन इथं स्वारी केली। पंचवीस वर्ष तो मराठी देशावर थैमान घालत होता. पण कोकणात किनारपट्टीचा एकही सागरी किल्ला अन् कोकणची वीतभर जमिनही औरंगजेबाला पंचवीस वर्षात जिंकता आली नाही. अजिंक्य! कोकण अजिंक्य , भंडारी अजिंक्य , आगरी अजिंक्य , कोळी अजिंक्य , समुद अजिंक्य , मराठी राज्य आणि मराठी ध्वज अजिंक्य. हे कर्तृत्त्व कोणाचं ? हे या कोकणी मर्दांचं.
आणि आज याच माणसांना आम्ही मुंबईत ‘ रामागाडी ‘ म्हणून भंाडी घासायला लावतोय. मॅक्सी अन् साड्या धुवून वाळत घालायला लावतोय. हॉटेलात कपबश्या विसळायला लावतोय. वास्तविक यांचा मान भारताच्या आरमारी नौकांवरून शत्रूवर तोफा बंदुकांनी सरबत्ती करण्याचा आहे. ही सारी मार्शल रेस आहे. शिवाजीमहाराजांनी तीनशे वर्षांपूवीर् हे ओळखलं. कोकण अजिंक्य बनवलं. आमच्या लक्षात केव्हा येणार ? ब्रिटीश विल्यम पिप्ससारखा एखादा कान्होजी आंग्रा , मायनाक भंडारी किंवा एखादा मराठी दौलतखान आम्हाला आज लाभेल का ?
-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे


Share this article :

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations