या वर्षीची दिवाळी माझ्यासाठी खुप म्हणजे खुपच ख़ास होती, कारण या वर्षीची दिवाळी पाहाट मी साजरी केली ती चक्क किल्ले रायगडावर दिपोत्सव करुन. घरी तर आपण दर वर्षी दिवाळी साजरी करतो, पण गडावर दिवाळी साजरी करण्याची मजाच काही वेगळी आहे. आणि ती ही स्वराज्याची राजधानी दुर्ग दुर्गेश्वर रायगडावर आणि महाराजांच्या सानिध्यात म्हणजे दुग्धशर्करा योगच. गेल्या वर्षी टी.व्ही. वर हा दिपोत्सव सोहळा मी पाहिला, तेव्हाच मी ठरवले की आयुष्यात एकदा तरी हा अनुभव घ्यायचाच. आणि ही माझी इच्छा लगेच पूर्ण झाली ती माझा मित्र अजित पाटिल आणि बेलापुर च्या 'शिवप्रेमी ग्रुप' मुळे. त्याबद्दल मी त्यांचा खुप खुप आभारी आहे. मुळात रायगडावर दिवाळी साजरी करणे ही कल्पनाच फार सुंदर आहे. कारण ज्या शिवाजी महाराजांच्या कृपेमुळे आपण आज आपली दिवाळी साजरी करतोय, आपल्या घरात रोशनाई करतोय, त्या महाराजांना आणि गडाला दिवाळीच्या सणाला मिट्ट काळोखात राहु देण ही आपल्यासाठी फार खेदाची गोष्ट आहे. यापेक्षा वाईट काही असुच शकत नाही. म्हणून ही संकल्पना ज्यांच्या मनात आली त्याचं मनापासून स्वागत.
आमच्या 'एक पहाट रायगडावर' या मोहिमेची सुरवात झाली ती लक्ष्मी पूजनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी नरकचतुर्दशीला. मी आणि माझा मित्र आदित्य दोघेही शिवप्रेमी ग्रुप सोबत जाणार होतो. आम्ही दोघेही ग्रुप मधे नवीन होतो पण आम्हाला तशी जाणीव बिलकुल झाली नाही. पुर्ण रात्र गडावर घालवायची असल्यामुळे कसलीच घाई न्हवती. मजा मस्करी करत, महाराजांचे पोवाड़े ऐकत आम्ही रायगडाच्या पायथ्याच्या गावी म्हणजेच पाचाड ला पोचलो. पहिले दर्शन घ्यायचे ठरले ते राजमाता जिजाऊंचे. जिजाऊंची समाधि म्हणजे एक अतिशय शांत, नीरव आणि पवित्र असे स्थान. जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आणि एक पणती पेटऊन दिपोत्सावाची सुरवात करण्यात आली. थोडा वेळ त्या रम्य जागी विश्रांति घेऊन मग पुन्हा रायगडाकडे कुच केली. रायगडाच्या पायथ्याशी पोचलो तेव्हा दुपारचे १ वाजले होते. समोरच्याच एका छोट्याश्या हॉटेल मधे जेवणाचा कार्यक्रम उरकला कारण सर्वाना ओढ़ लागली होती ती गडावर जाण्याची. किल्ल्याचा पायथाच एक डोंगरभर उंच आणि पायथ्यावरून दिसणारा रायगड म्हणजे गरुडाच्या झेपेतहि ना बसण्यासारखाच भासत होता. महाराजांचा जयजयकार झाला, हर हर महादेव च्या घोषणा झाल्या तसे सर्वाना एकच स्फुरण चढले आणि गड चढण्यास सुरवात झाली.माझी तशी रायगडावर यायची ही दूसरी वेळ त्यामुळे प्रत्येक पायरीबरोबर गेल्यावेळेच्या आठवणी मनात येत होत्या. माझ्या 'भटकंती unlimited' च्या सर्व मित्रांना मी खुप मिस करत होतो कारण त्यांच्या शिवाय हा माझा पहिलाच ट्रेक होता.
चढलेल्या प्रत्येक पायरी बरोबर गडमाथा आजुन जवळ येत होता. अखेर १५०० पयऱ्या क्रमित,धापा टाकत, घामाने चिंब होउन, महादरवाजा पार करुन आम्ही गडावर येऊन पोचलो. हाच तो महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष देणारा गड. शिवछत्रपतींनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी. ज्याने छत्रपती शिवाजी महाराज पाहिले, छत्रपती संभाजी महाराज पाहिले, याच किल्ल्यावर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले. हिंदवी स्वराज्याचा सुवर्णकाळ याच गडाने पाहिला. याच गडावरुन स्वराज्याच्या अनेक मोहिमा आखल्या गेल्या. महाराजांच्या राज्याभिषेकापासून ते महाराजांच्या अंतिम काळापर्यंत राजांनी याच गडावरुन त्यांचे राज्य चालवले. याच गडावर आजची रात्र आम्हाला जागवायची होती, याचा इतिहास नव्याने जाणायचा होता, गड पुन्हा एकदा दिव्यानी ऊजाळुन टाकायचा होता.
ठरल्याप्रमाणे आम्ही गडावर येऊन पोचलो. बॅगा ठेऊन फ्रेश होऊन सगळे राजदरबारकडे निघालो. राजदरबारात छत्रचामरखाली सिंहासनावर बसलेल्या महाराजांच्या प्रतिमेला नकळत नतमस्तक व्हायला होते. कोण तो माझ्या राजाचा थाट. राजदरबारात पहाटेच्या कार्यक्रमाची तयारी चालु होती. फुलांच्या माळा साजत होत्या, रांगोळ्या पडत होत्या, मशाली लागत होत्या. वातावरण उत्साहाने भरून गेले होतो. त्या कामात आम्हीही खारीचा वाटा उचलला आणि मग गड पाहायला सुरवात केली. संध्याकाळची वेळ, मस्त ठंड वारा सुटला होता. दिवस मावळायच्याआधी गड पहायचा होता. मग एक एक करुन शिरकाईचे मंदीर,होळीचा माळ, बाजारपेठ,हत्ती तलाव, गंगासागर तलाव, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राणीवसा, महाराजांचे राजभवन, अष्टप्रधानांची घरे, नगारखाना,धान्याची कोठारे, खलबतखाना ही ठिकाणे पाहुन घेतली. एव्हाना सूर्यनारायण अस्तास गेले होते. गडावर ही गर्दी झाली होती.आयोजकांनी सर्वांसाठी गरमा गरम पोहे आणि चहा ची सोय केली होती. त्यावर सर्वांनी ताव मारला. गप्पा मारता मारता २ तास कसे गेले ते कळलेच नाही. जेवणाची सोय ही आयोजकानी उत्तम रित्या केली होती. जेवण संपऊन आम्ही पुन्हा राजसभेकडे जाण्याचा निर्णय घेतला. टॉर्च च्या उजेडात आम्ही राजसभेत येऊन पोचलो. कोणत्याही गडावर रात्र घालवण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. अमावसेच्या रात्री, चांदण्यांच्या प्रकाशात , मोकळ्या आभाळाखाली, घोंघावणार्या वाऱ्यात आणि बोचऱ्या थंडीत आमची मस्त पंगत बसली. इतिहासाच्या चर्चेला उधाण आले होते. गप्पाचा फड चांगलाच रंगला होता. एक एक प्रसंग डोळ्यासमोरून जात होते. आता रात्रीचे २ वाजत आले होते. कार्यक्रमाची खरी सुरवात तर आत्ता होणार होती. आयोजकांनी स्वपरिचय आणि ओळखसत्राचा एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता. त्यातून समजले की संपूर्ण महाराष्ट्रातून लोक दिवाळी साजरी करायला गडावर आले होते. जवळपास २५० ते ३०० जण गडावर दिवाळी साठी उपस्थित होते.
शिवप्रेमी ग्रुप च्या वतीने उपस्थितांना महाराजांचे पोवाडे आणि महाराजांच्या संदर्भातील भाषणाच्या सीडीज वाटन्यात आल्या.
मुख्य कार्यक्रमाची लगबग आत्ता सुरु झाली, सर्वानी पारंपारिक पोशाख चढवला. पांढरे, भगवे कुरते घालून मुले सज्ज झाली तर स्त्रिया नऊवारी नसून. काहिनी डोक्यावर फेटा घातला, चंद्रकोर तर संगळ्यांच्याच कपाळी आरूढ़ झाली होती. सगळे जण तयार होऊन पहाटे ३.३० ला जगदीश्वराच्या देऊळात जायला निघाले. तिथेच शंकराच्या पिंडिवर अभिषेक होऊन दिपोत्सवाची सुरवात होणार होती. जगदीश्वराचा गाभारा आणि मंडप लोकांनी भरून गेला होता. अभिषेक झाला आणि दिपोत्सवाला सुरवात झाली. तेवढ्यात आपला सर्वांचा लाडका अभिनेता दगडू म्हणजेच प्रथमेश परब आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचे देवळात आगमन झाले. त्यानी सुद्धा देवळात दिवे लावण्यास मदत केली. अभिषेका नंतर सर्व जण महाराजांच्या समाधी जवळ जमा झाले. समधीजवळ मशाली शीलगावण्यात आल्या, प्रतिज्ञा झाली, एकच जयघोष झाला, एकच चैतन्य गडावरच्या वातावरणात आले होते. समाधिला वंदन करुन मशालीच्या प्रकाशात सगळे निघाले ते होळी च्या माळाकड़े. जगदीश्वर ते होळीचा माळ हा पूर्ण रस्ता मशालीच्या प्रकाशात ऊजाळुन निघाला होता. क्षणभर तर मला आपण शिवकाळातच आलो की काय असा भास झाला. होळीच्या माळावर पुन्हा जयघोष झाला आणि त्याच जयघोषात आमची प्रभात फेरि राजसभेकडे निघाली. दरबारात घोंघावणाऱ्या वाऱ्यापुढे पणत्या टिकुच शकल्या नाहीत पण मशालिंनी त्यांचे काम चोख केले. संपूर्ण राजसदर मशालीच्या उजेडात ऊजाळुन निघाली होती. डोळ्यांचे पारणे फेडणारा तो क्षण होता. सगळे तो डोळ्यात समांऊन घेत होते. कोणाच्याही डोळ्यावर झोप न्हवती, अंगात थकवा नव्हता, की थंडीची फिकिर नव्हती.
सगळ्यांच्या येण्याचे सार्थक झाले होते.
ही दिवाळी पहाट सर्वांना आयुष्य भर लक्षात राहणार होती. आता ओढ़ लागली होती ती सूर्योदयाची. तो क्षण ही अगदी लक्षात ठेवण्या सारखच होता. बाकीच्यांसाठी ती दरवर्षी प्रमाणे फक्त एक दिवाळीतली पहाट होती पण आमच्यासाठी ती आयुष्यात कधी न विसरता येणारी दिवाळी पहाट होती.
- कल्पेश-
Post a Comment